रविवार, ९ जून, २०१३

मैं पल दो पल का ब्लॉगर हुं…

परवाच एका न्यूज च्यानेलावर चर्चा चालू होती... "पाचसहा वर्षांपूर्वी अचानक ब्लॉगर्सचं पीक आलं होतं. आता कुठे गेले सारे!?", त्यातल्या एकांचं मत पडलं.

मला प्रश्न बरोबरच वाटला. मी स्वतः देखील लय ब्लॉगरगिरी करायचो. आता कुठला ब्लॉग आणि कसचं काय!? साहिर लुधयानवींना मनोमन  नमस्कार करावाच लागला,

मैं पल दो पल का ब्लॉगर  हुं…
पल दो पल मेरी कहानी है …
पल दो पल मेरी हस्ती है…
पल दो पल मेरी ….

… गाणं काही सालं पूर्ण करवेना. जिंकलात साहिर शेट ! म्हणजे परत फिरून वयाकडेच! आपलं वय वाढावं असं कधीच, कोणालाही  वाटत नसतं, पण ते वाढतं खरंच. बहुतेक मग  ब्लॉगचंही वय असावं, आणि तरुणपणीचा उत्साहही.. ब्लॉगचंही वय वाढत असेल, तर ब्लॉगही परिपव्क व्हायला हवा. चायला, पण म्हणजे काय म्हारा ब्लॉग म्हातारा  हो गयेला है की क्या? काय समजावं??

प्रत्येकाची ब्लॉग सुरु करण्यामागची कारणं अनेक, तशीच तो बंद पडण्याचीही अनेक असतील. माझं कारण? काय माहित?! ब्लॉगर्स ब्लॉक वगैरे शहाणपणा ….  नको! ते राहुदेच .....

जूनचा महिना आहे, पहिला पाऊस नुकताच झाला. हुशार्गीरी करत काहींनी फेसबुकाव म्हणून घेतलं, "पळा पळा नाह्यत पावसाळी कवितावाले येतील! "
लेकाच्यांनो!?!? तुम्हीही त्यातलेच एक होतात! विसरलात ???

मी पा. क. ही पाडली नाही आणि बोंबही मारली नाही. ब्लॉगचं बंद होणं म्हणजे हेही आहेच की… बरं, प्रत्येकवेळी शहाणपणाच सुचायला आम्ही काही आयन्स्टायनाचे चुलतेपण नव्हेत!

पण ते  काहीही असो, घेतला वसा टाकायचा नाही वगैरे म्हणत तूर्तास मनात इतकंच आहे, की परत पुर्वीसारखं व्हायचं. पावसाला एकट्याने पडून नदीनाल्यात मिसळू द्यायचं नाहीच! पावसाचे तरंग मनावर उमटले तर मनातच ठेवायचे नाहीत. हा पाऊस वाया घालवायचा नाही. साहिरशेटचा शेवटच खरा करायचा…

मैं हर एक पल का ब्लॉगर  हुं…
हर एक पल मेरी कहानी है …
हर एक पल मेरी हस्ती है…
हर एक पल मेरी जवानी है …  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: