शनिवार, १४ जून, २००८

यात्रा भाग : २

अं? हे काय अचानक? भाग : २??

इथे वाचा : )
यात्रा भाग १

(यळगुड सेंटेड) दूध पिउन झालं आणि ब्यैग आमच्या गाडीत ठेवायला जाऊ लागलो...
"साहेब... मुम्बई आहे काय?? क्षशे रुपये... लगेच सुटणार..." इति :- एक ट्रैवल्सवाला....
"नाही.."
"साहेब, ३ शीट ना ? कमी करतो की!! लगेच सुटणार..."
"अरे सुट की मग, नाई यायचं सांगितलं ना एकदा ?", बाबा वैतागुन म्हणाले...
देशात पाउल ठेवल्या ठेवल्या मला परत पाठवायला पेटले होते लोक....

"गुलाबजाम" केले आहेत...
"कोफ्ता करी" केली आहे..



रात्री लाईट काहीतरी करुया...

उदया सकाळी श्रीखंड.. ( दही तान्गून ठेवलंय.. )
रात्री मिसळ...
परवा मावशीकडे बोलावले आहे... " आमची आई !
"खा खा आणि खा....", दोन तीन दिवस असेच गेले... अर्थात मधे मधे "जा" होतंच...

बदलान्बद्दल मला जे कुतूहल आहे (म्हणजे ?? वाचा यात्रा भाग १ :p ) त्याबद्दल एक मोठा बदल म्हणजे आमच्या घरी ब्रौड़बैंड इंटरनेट आलं होतं!! "जिंकलायस भावा !!!"
तिथून जेव्हा ओ र कु आणि एक्सेस केलं तेव्हा कुठे चैन पडली...

"भारत स्वतंत्र झाला! स्वातंत्र्यपूर्व भारतात असणारी संस्थाने भारतात विलीन झाली..
"राजे महाराजे" वगैरे काही राहिले नाहित..."
कोण म्हणतं?? साधारण एक वर्षानंतर सुट्टीवर आलेला मी, स्वतंत्र भारतातला राजाच झालो होतो...

"अरे, तू कशाला.... तू बैस...."
"नको नको...."
"तो आता झोपलाय... नंतर या..."
"अरे खा रे... तिकडे कुठे मिळणार आहे??"

"काम ना धाम... नुसता आराम.. ", असा मी "रजेवर आलेला राजा" झालो होतो...
स्वातंत्र्यपूर्व भारतात जसे असंख्य राजे होते, तसे आजकालही रजेवर आलेले असंख्य राजे पहायला मिळतील..
कंपनीच्या कृपेने "यात्रा" स्वस्त झाल्याचा परिणाम... त्यामुळे आत्ताची ही कथा अशा सगळ्या राजांची आहे...

असाच एक राजा..कुठल्या एका संस्थानाचा...
असाच बोलता बोलता म्हणाला, सुट्टीवर गेलं की काही लोक उगाचच घरी येतात...."
"काही घरी बोलावतात..."
"दोन आठवडे काय ती सुट्टी.. त्यात कोणाकोणाला भेटायचं?"
"लोकांना कळत कसं नाही?" वगैरे ....
त्या राजाला त्यामागचं प्रेम, त्यामागची आपुलकी कळलीच नसावी..
"आपण विशेष काही न करता लोक आपल्याला घरी बोलावून चांगलं खायला प्यायला
देतात.. चांगलं कौतुक करतात... यात चिडायचंय कशाला??"

"अतिशय सुंदर साबूदाणा वडे!
कोल्हापुरी मिसळ!
जबर्‍या चिवडा (पार्सल, देश सोडताना म्हणून)!
मस्त शंकरपाळ्या !(पार्सल, देश सोडताना म्हणून)! "
असं सगळं चांगलं चांगलं खाताना आपल्या लहानपणीच्या चांगल्या चांगल्या आठवणी काढणारे चांगले असे किती लोक असतात? दुर्दैव महाराजांचं... "अय कंबखत तुला समजलंच नाही!"

बरंच विषयांतर झालं... मुळ विषय यात्रा होता... तर आत्तापर्यंत हजारदा (बर, १०० वेळा) केलेली "कोल्हापुर - पुणे यात्रा", ती परत करायची होती... काही कामं होती...

सकाळी सातची कोल्हापूर पुणे एशियाड पकडली.. गाडी रिकामीच होती. "डाव्या बाजूची मधली"( सर्वात सुरक्षित असते म्हणे! तर ती) शीट मिळाली..उजविकडची शीट पण रिकामीच होती.. सहज लक्ष गेलं तर त्याच्या खाली "कासव छाप" पडलेली होती..अर्धवट जळलेली.च्या मायला बंड्या... हे काय म्हणायचं?

रात्रीची गाडी.. झोप लागावी म्हणून लोक "वातावरण-निर्मिती" करतात... ऐकलं होतं..माझा एक मित्र झोप यावी म्हणून सर्दि वगैरे नसूनही आयोडेक्स लावतो.. असं काही असावं असा मी अंदाज केला...


गाडी सुरू झाली... थोडिशी झोप लागायला लागली होती. अचानक कानाजवळ घुंग-घुंग असा आवाज आला..."डास ?! " " एस टी मधे "डास ?!" "

देंग्यु, मलेरिया, टयफ़ाईड, प्लेग... सग्ळं एका सेकंदात आठवलं...

मोठे मोठे डास बघून थोडं चुकीचंच आठवलं, पण तरी काय...

आता डासांपासून वाराच वाचवेल असं वाटलं... "खिड़की खोलो, डास भगाव॥"

सेफ्टी बिगिन्स @होम म्हणत मी माझी खिड़की उघडायला गेलो तर मागच्या शीटवरचा कोणीतरी एकदम खाकरला...

"डास आहेत..खिड़की उघडुया म्हणजे जातील..."

"वाट" तो म्हणाला..

"तेच की... वाट आहे..."

"वाट यु सेड??"

"ओपन दी विंडो. मोस्किटो "

"ओह...वोके॥"

तेवढ्यात कंडक्टर आला.."काय साहेब? " "तुमच्या एशटीत डास?" मी मजेत म्हणालो..

वारं आलं आणि डास कुठे गेले...

अतीतला जाग आली... मस्त वडा पाव खाल्ला...

गाड़ी एकदम वेगात चालू होती त्यामुले परत झोप लागली...

अचानक घुंग घुंग आवाज आला...

मागच्या शीट वरून येत होता... तिथला "वाट" गायब होवून तिथे एक "नवतरुण" आला होता...

तोच गुणगुणत होता...

कंडक्टर परत आला... मगाशी मी चेष्टा केल्यापासून तो सारखा ये जा करत होता, आणि खुन्नस देत होता.

माझे तिकिटाचे उरलेले पैसेही त्याने दिले नव्हते...

उगाच बोललो वाटलं.. त्याची काय चुक म्हणा

गाडीतून उतरताना पैसे न मागता उतरलो..

"साहेब, पैसे.. गाडी धुवून घेतो काय..."

"सॉरी...पण चांगलं वाटतं काय?", मी...

"बरोबराय.. मीच सॉरी साहेब.." एका

एका पसिंजरला गाड़ी लागली बगा...

"बर, ठीक आहे..."

"गाड़ीत बसून" "गाड़ी लागणे जरा विचित्र आहे ना?

मला एकदम मी विमानात पहिल्यांदा बसलो ते आठवलं..

आपल्या शीटसमोर असलेल्या कप्प्यातुन आतली कागदी पिशवी मी बाहेर काढली होती..

नंतर समजलं, विमान "लागलं" तर "वापरायची" असते...

पुण्याला पोचलो आणि थेट मित्राच्या रूमवर ...वर्षभराने सगळे भेटणार आहेत..... आता सगळे कामावर गेले असतील पण "विद्या अर्जन" करणारे काही लोक होते! ते तरी भेटतील...

कुलुप ?? खोलीला कुलुप???

मग आठवलं... त्या लोकांनी रूम बदलली होती...आता ती मोठी बैग घेउन एक चौक पुढे त्यांच्या

घरी चालत जाणे आलं.. (क्रमशः )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: